निसर्गाच्या कोंदणात चमकणारा एक लहानसा, नाजूक, पण अत्यंत जिवंत स्वर,तो म्हणजे चिमणीचा चिवचिवाट! जणू कवीच्या ओळींना ताल मिळावा तसे तिचे मंजुळ स्वर मनाला आनंद देतात. पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात, झाडांच्या फांद्यांवर, छताच्या कपारीत आणि ओसऱ्यांमध्ये सहज दिसणारी ही सजीव काव्यकळा आज मात्र आपल्यापासून हरवू लागली आहे.
शहरीकरणाच्या दणक्यात हरवलेली ही नाजूक चिमणी, निसर्गाच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. तिच्या अस्तित्वावर घोंगावणाऱ्या संकटांनी पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. याच भानावर ठेवत २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून आपण या नाजूक जीवांच्या संवर्धनासाठी जागरूक होऊ आणि त्यांना पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवू.चिमणी ही केवळ एक साधा पक्षी नाही, तर ती निसर्गाच्या अविरत संगीताची एक सुरेल तान आहे. तिच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो.ज्या परिसरात चिमण्यांचे वास्तव्य आहे, तो परिसर समृद्ध आणि सजीव असतो. त्या लहान कीटक, अळ्या, अन्नधान्याचे तुकडे आणि गवताच्या बिया खाऊन निसर्गातील अन्नसाखळी टिकवून ठेवतात. त्यांचा चिवचिवाट म्हणजे त्या परिसरातील आरोग्यदायी वातावरणाची साक्ष देणारा संकेत असतो.
चिमण्या फुलांवर बसून मधुरस ग्रहण करताना परागकणांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे त्या फुलांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे परागीभवन शेतीसाठी उपयुक्त ठरत असल्याने त्या निसर्गातील एक निसर्गनिर्मित शेतीसहायक घटक आहेत.कीटक नियंत्रणासाठी आपण मानव निर्मित रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करतो, पण चिमण्या मात्र हे कार्य नैसर्गिक पद्धतीने करतात. त्या डास, माश्या, सुरवंट आणि लहान किडे खाऊन कीटकसंख्येवर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे पर्यावरण संतुलित राहते..एकेकाळी घरोघरी सहज वावरणाऱ्या या छोट्या जीवांचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे.पूर्वी मातीची घरे, लाकडी छप्पर आणि मोठमोठ्या झाडांमुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी भरपूर संधी मिळत असे. परंतु, आजच्या आधुनिक काँक्रीटच्या जंगलांमध्ये त्यांच्या घरट्यांसाठी जागा उरलेली नाही.
मोबाईल टॉवर्समधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनमुळे , किरणोत्सर्ग, चिमण्यांच्या दिशादर्शन क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे त्या अन्न शोधण्यात अयशस्वी ठरतात आणि हळूहळू त्यांच्या संख्येत घट होते.
रासायनिक कीटकनाशक आणि प्रदूषणामुळे चिमण्यांचे अन्न विषारी बनले आहे. अन्नाच्या शोधात त्या हलक्या विषारी पदार्थांचे सेवन करतात आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य खालावत जाते.
निसर्गाचा समतोल राखणारे वृक्षतोडीमुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांना निवासासाठी जागा राहिलेली नाही. झाडांच्या फांद्यांवर घरटे बांधणाऱ्या चिमण्यांचे स्थानच नाहीसे झाले आहे.चिमण्यांसाठी आपल्या घराच्या अंगणात किंवा गच्चीवर तांब्याच्या अथवा मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. तसेच, त्यांना बाजरी, गहू, ज्वारीसारखे लहान दाणे टाका. कारण चिमणी ही केवळ पक्षी नसून, ती निसर्गाच्या गूढ लयीत मिसळलेली एक नाजूक पण महत्त्वाची कडी आहे. तिच्या चिवचिवाटाने वातावरण प्रसन्न होते आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. म्हणून चिमणी वाचवणे काळाची गरज आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -