मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

SHAHUJI MAHARAJ ...शैक्षणिक क्रांतीचे जनक :-"शाहू महाराज"



Shahuji Maharaj 
---------------------------
शैक्षणिक क्रांतीचे जनक :-"शाहू महाराज"
काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणे आखून अमलात आणली.
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे हे आपण अनेक नेत्यांच्या भाषणातून नेहमीच ऐकत असतो आणि पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला कि एका नावाचा हमखास उल्लेख होतो, ते नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आज भारतात जातीवाद असला तरी त्याची धार बरीच बोथट झालेली आहे. आजही समाजात विषमता दिसून येत असली तरी त्याची तीव्रता व प्रमाण पूर्वीसारखे राहिलेले नाही. ह्याचे श्रेय शाहू, फुले, आंबेडकर ह्यांना व ह्यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांना जाते.
बहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी. समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला पण त्यांनी ह्या विरोधाला न जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले. आज मागास, दलित, बहुजनांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधरली ह्याचे कारण छत्रपती शाहू महाराजांचे कठोर प्रयत्न, त्यांनी आखलेल्या व पूर्णत्वास नेलेल्या योजना.

रयतेचा राजा

रयतेचा राजा अशी पदवी रयतेनेच बहाल करावी ह्यातच शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य व त्यामुळे बहुजनांच्या मनात त्यांना मिळालेले मानाचे स्थान ह्याची कल्पना येते. आजपर्यंत भारतात अनेक समाजसुधारक होऊन गेले, परंतु शाहू महाराजांचे वेगळेपण असे कि त्यांनी बहुजनांची केवळ सामाजिक परिस्थिती सुधारण्याकडेच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याची प्रत्यक्ष तरतूद केली.
शिक्षणानंतर बहुजन व मागासलेल्या वर्गाच्या रोजगाराचीही सोय व्हावी, ते आर्थिक दृष्ट्यासुद्धा सक्षम व्हावेत ह्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची संकल्पना त्यांनीच मांडली व म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते. १८९४ साली जेंव्हा त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतला तेंव्हाच त्यांनी बहुजन व मागासवर्गीयांच्या उन्नतीचे उद्दिष्ट ठरवले व आपल्या दूरदर्शी योजनांद्वारे ते उद्दिष्ट पूर्णत्वास नेले.
 पुरोगामी भारत=
मानसिक गुलामी दूर करायची असेल तर सर्वप्रथम अज्ञान दूर व्हायला हवे हे शाहू महाराजांनी अचूक ओळखले. हे अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गुलामीचे जोखड झुगारून देण्याचा एकच उपाय आणि तो म्हणजे शिक्षण. त्यासाठी महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यांनी असा आदेशच जारी केला कि सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण घ्यावेच लागेल अन्यथा दंड ठोठावण्यात येईल. शाहू महाराज केवळ आदेश देऊन स्वस्थ बसले नाही तर आपल्या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याची संपूर्ण माहिती नियमितपणे त्यांना मिळावी अशीही व्यवस्था केली. ह्यातून त्यांची सर्वसामान्य रयतेप्रती असलेली तळमळ दिसून येते व शाहू महाराजांना लोक रयतेचा राजा का म्हणत हे सुद्धा समजून येते.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम असा झाला कि १८९३ साली प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या जी अतिशय कमी होती, १९२१ सालापर्यंत ती जवळजवळ ४९६ एवढी झाली व शिक्षित विद्यार्थ्यांची संख्या तब्बल २७ हजारांपर्यंत वाढली व हाच होता पुरोगामी महाराष्ट्राचा पाया.
 चार सूत्र=
१) प्राथमिक शिक्षण हि पुढील शिक्षणाची पायरी आहे त्यामुळे आधी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे, ज्यामुळे उच्च शिक्षण घेणे सहज शक्य होईल.
२) त्याकाळी शिक्षण घेणे हि केवळ एका विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी होती, त्यासाठी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या घटकांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे ह्याची विशेष तरतूद केली ज्यामुळे तो घटक शिक्षणापासून वंचित राहणार नाही ह्याची काळजी महाराजांनी घेतली.
३) आपल्या संस्थानाच्या सर्व भागांत शिक्षणाचा प्रसार व्हावा व ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये ह्यासाठी त्यांनी शहरांमध्ये मागास व अन्य जमातींसाठी वसतिगृहे चालू केली. परिणामी ग्रामीण भागातील मुलांना शहरात राहणे व शिक्षण घेणे शक्य झाले.
४) शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे ह्यासाठी रोजगार आवश्यक होता, त्यामुळे नोकऱ्यांमध्ये काही राखीव जागांची तरतूद महाराजांनी केली. शाहू महाराजांनी जवळजवळ ३ दशकं राज्यकारभार केला व समाजव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणले. त्याकाळी सवर्ण समाजाची मुलं वेगळ्या शाळेत शिकत व अस्पृश्य समाजातील मुले वेगळ्या शाळेत शिक्षण घेत असत. हि निंदनीय प्रथा सरळसरळ विषमता व जातीवादास खतपाणी घालणारी होती हे महाराजांच्या लक्षात आले व तातडीने त्यांनी आदेश जरी केला कि ह्यापुढे हि पद्धत अस्तित्वात राहणार नाही. सर्वांसाठी एकच शाळा असेल ज्यात सर्व जाती- धर्माची मुले शिक्षण घेऊ शकतील. हा निर्णय समाज व शिक्षण व्यवस्थेवर फार मोठा परिणाम करणारा ठरला ज्यामुळे विषमतेच्या मुळावरच घाव बसला होता.शिक्षणाचा प्रसार :-
इ. स.१९०१ मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ ची स्थापना केली. त्यांनी कोल्हापुरात निरनिराळ्या जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली.
इ. स. १९०२ मध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.
इ. स. १९०७ मध्येच शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे वसतिगृह उघडले.
१९१३ मध्ये शाहूंच्या आदेशानुसार खेड्यांमध्ये चावडी, धर्मशाळा, मंदिरे व होते. या इमारतींमधून शाळा सुरू झाल्या.
इ. स. १९१६ मध्ये बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली.
इ. स. १९१७ मध्ये शाहूंनी प्राथमिक शाळेतील फी माफीची घोषणा केली. २१ नोव्हेंबर १९१७ रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले.

आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी इत्यादी ठिकाणी समानतेने वागवावे, असे आदेश त्यांनी काढले.

इ.स. १९१९ मध्ये बलुतेदार पद्धत बंद करण्याविषयीच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला त्यांनी १०० रु. दंड व चार दिवसांची कारावासाची शिक्षा देणारा कायदा केला.

२६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.

०१ एप्रील १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या “लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराज यांचा विवाह झाला.
शाहु महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी एकुण ०४ आपत्ये होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्याहुन पडुन मृत्यु झाला होता. १८९३ मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले.
०२ एप्रील १८९४ रोजी शाहु महाराजांचा “राज्याभिषेक” होवुन वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहु महाराजांनी स्विकारली व शाहु महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली.
शाहु महाराजांच्या राज्याभिषेक साहेळ्या दरम्यान ब्रिटीश सरकार तफै मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता.
१८९६ साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थांसाठी शाहू महाराजांनी “राजाराम” हे वस्तीगृह सुरु केले व याच सालापासुन शाहू महाराजांच्या वस्तीगृह निर्मातीच्या कार्याला सुरुवात झाली..
 महाराजां
०२ जुन १९०२ रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या ०७ व्या एडवर्ड च्या राज्यरोहन संमारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाचे वेळी केंब्रिज विद्यापीठाने शाहु महाराजांना LLD ही पदवी बहाल केली.@बालस्नेही-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...