मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

आईचे डोळे* - श्री. प्रविण दवणे.


 

*आईचे डोळे*
                                                                                        - श्री. प्रविण दवणे.
 सुंदर कथा आहे कृपया पालकांनी आपल्या मुलांना जरूर एकदा ही कथा वाचून दाखवावी.-

          गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकुष्णाच अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर शोधता शोधता प्रश्न पडला- 'अशा झोपडपट्टीत राहतो रामकुष्ण ? पण राहतो किती नीटनेटका.' त्याच्या व्यक्तीमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. 
      गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेलो. 'इथंच तो राहतो', म्हणून कुणीतरी सांगितलं.
       काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा सलील माझ्या आवाजानंच बाहेर आला. "सर ?" आत गेलो. "अभिनंदन!" गुच्छ देत म्हटलं.
      मला जायला तसा तीन-चार दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रूटिन सुरू झालं होतं.
     गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाचं हे असं घर ?रामकुष्णं अभ्यास कुठे केला असेल ? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल ? त्याचं पुन:पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत स्वतःलाच विचारीत होतो.
      "सर, खूप खूप बरं वाटलं, खरं तर तुम्ही घरी आलायत, हे खरंच वाटत नाहीये. सावरलेलो नाहीये मी. तुमच्यासाठी चहा करतो," म्हणत तो स्टोव्हला पंप मारू लागला. 
     "रामकुष्ण, राहू दे. आपण बाहेर घेऊ,"
      "तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो. फक्त चहाचं." चहाच्या वाफांनी वातावरण भारलं. 
     ''घरात दुसरं कुणी ?"
     "ताई आहे. टायपिंगच्या क्लासला गेलीय. वडील किराणा दुकानात हमाल आहेत."
         "आई... ?"  "आई ? नाही." रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचारानं मी गोंधळलो. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता. अगदी जीव ओतून !
      "रामकुष्ण, तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास. भेटत होतास. उत्तरपत्रिका पुन:पुन्हा तपासून घेत होतास. पण तेव्हा तुझ्याकडे पाहून...."
      "सर, माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का ? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कृणीतरी 'अरेरे' करून म्हणणं... यानं काय साध्य होतं? आतासुद्धा मला खूप बक्षिसं मिळालीत. पण ती कायम पुरणार आहेत का ? पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार. टीव्हीवाले आले, निघून गेले. एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत. सर, परिस्थिती माणसाला आहे त्यापेक्षा मोठं करते."
        रामकुष्णाची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती. ती वाक्या- वाक्यातून, डोळ्यातून चमकत होती. "कुठून शिकलास हे सगळं ?"
    "सभोवतीच्या मुलांकडून,"
      "म्हणजे ?"
      "ती नुसताच टाइमपास करतात. बहुतेक नापास होतात. मग रात्री जुगार !
      चोरी , लुबाडी हा त्यांचा उत्पन्नाचा मार्ग. पितात, भांडतात ! तेव्हा ठरवलं- आपण तसं व्हायचं नाही. 
       याच वर्षी नाही: सातवीतच ठरवलं. सातवीतच माझी आई गेली. इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. साध्या न्यूमोनियानं."
       "बदलेल सारं...."
       "बदलतंच आहे, सर. गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे ?" तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात. काळजाशी दडलेले अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात.
       माझ्या आणि अनेक कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या, फी देऊन प्रवेश घेणारी, तरीही वर्गात बसणं 'पाप' मानणारी असंख्य मुलं !  त्यांच्याच वयाचा रामकुष्ण!
असेही अनेक चेहरे डोळ्यांपुढून झरकन् तरळून गेले.
        "रामकुष्ण, एकदा माझ्या वर्गात ये... मुलांशी गप्पा मारायला."
       "सर, एवढं मोठं करू नका मला. असे काबाडकष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातला वॉचमन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही. 
        आपण कुठल्या परिस्थितीत जगतो, आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात, याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क्स मिळतात. क्लासेस बिसेसची चैन झोपाळू मुलांसाठी.!"
      रिक्षापर्यंत रामकुष्णा बरोबर आलो. तिथेही बोलत राहिलो बराच बेळ. बोलता बोलता तो चटकन बोलून गेला. "सर, भोवतीची मुलं पाहुन केव्हातरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं."
       "मग, अशा वेळी...?"
      "मी... मी फक्त आईचे डोळे आठवतो."
       "आई ?"
       "राब राब राबायची ती.... कागदाच्या पिशव्या करीत. गोंद-कात्र्या घेऊन आम्ही तिच्याभोवती बसून तिला मदत करायचो. वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली. त्यानंतर वनवास मागे लागला.
      शेवटी ती बोलायची,  'मी काही आता जगत नाही; पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकतोस, मोठा होतोस, ते पाहण्यासाठी.' सर, ते डोळे आठवतात. हो!"
      रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं. सतत कुणीतरी आपल्याला सांगावंच का लागावं ? 'अभ्यास करा, लवकर उठा, पालक किती मरमर मरतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा असा एखाद् दुसराच.!"
     परवा एक शिक्षिका असलेली पालक आई स्टाफरूममध्ये विषण्ण चेहऱ्याने आली, "मुलगा सकाळी उठतच नाही हो. सातचं लेक्चर नेहमी बुडवतो. ऐकतच नाही. आता म्हणतो, शिकायचं नाही. काही करायचं नाही. कुणाचं मुळी ऐकतच नाही." फक्त रडायची बाकी होती ती बाई.
 खूप काही सुंदर घडविण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात, तेव्हा उशीर झालेला असतो. एक भकास दुपार... आणि निराश संध्याकाळ!
सकाळी उठण्यासाठी 'जबरदस्ती,' कॉलेजला जाण्यासाठी 'जबरदस्ती', मग शिकण्यासाठी.. परीक्षेसाठी.. त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी 'जबरदस्ती.!'
      जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का ? रोपानं स्वत:हूनच आतून ठरवलेलं असतं. विद्यार्थ्यानंही असं आतूनच  ठरवायला हवं. आईचे, बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का ?
      आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना, चाचणीत शून्य मार्क मिळवताना, बसमधून/ लोकलमधून लोंबकळत येणारे आई-वडील आठवत नाहीत ? मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत ? 
      घरात आपण लहान असू, पण जाणीवेनं थोडं समजूतदार झालं, तर पालकांच्या घामाचं गुलाबपाणी होऊ शकतं.
      यशाची राइसप्लेट रेडीमेड मिळत नाही, हे आत्ताच कळायला हवं. यश शिजत ठेवावं लागतं. परिस्थितीच्या धगीनं. कधी महत्त्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवावं लागतं. हे केव्हा कळणार ?
चाळीसाव्या वर्षी ?

      एस.एस.सी. ला फॉर्म भरायला पैसे नव्हते ते रामकुष्णाकडे पाहताना आठवून गेलं. आईच्या हातातली शेवटची सोन्याची बांगडी गहाण टाकण्यासाठी (तीही कधीच न मिळण्यासाठी) निघालेले माझे वडील आठवले.
      आई म्हणाली- "ही शेवटची. पूढे काय ?"
       अजूनही घरातले ते क्षण आठवताहेत. नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते. निष्कांचन आईला पुढे येऊ न देणारे नातेवाईक आठवले. कुणाच्या तरी लग्नात "माझी बोरमाळ तू घाल थोडा वेळ, अगदीच काळी पोत बरी दिसत नाही," असं आईला म्हटल्यावर, "माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही. आले तर जशी आहे, तश्शीच येईन." हे बाणेदारपणे सुनावणारी आई आठवली. आणि नंतर ती म्हणाली होती- "माझा दागिना बघायचा असेल तर माझा मुलगा पाहा." त्या वाक्याने केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर, ते आठवलं.
      असे प्रसंगच झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरांजन होऊन येतात.
      *दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, उदासीनता, ध्येय-शून्यता पार नेस्तनाबूत करते माणसाला.!* 
     मला दिलेल्या एका मूलाखतीतलं आशा भोसले यांचं वाक्य आठवलं, "सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही."
       खुप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्यं तेव्हाच घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू, अपार विश्वासाने कर्तृत्व गाजविण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठविलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे ! आपल्या आईचे डोळे... !!!

*©️ श्री. प्रविण दवणे.* 
#तारे जमी पर 
@बालस्नेही ,महाराष्ट्र ...



*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...